तू आल्यावर..! मनास माझ्या नवे धुमारे तू आल्यावर.. दुःख नाहिसे क्षणात सारे..तू आल्यावर...!! अंधाराने थिजल्या होत्या जीवनवाटा, झोपडीतही फुलले तारे..तू आल्यावर..! संकट संकट खेळूनी मी थकलो होतो मनगटात मग बळ संचारे..तू आल्यावर..! दुःखाची नित वाहत होती गंगा दारी आनंदाचे वाहे वारे..तू आल्यावर..! साखरेहून आज गोडवा मला लाभला स्वप्न लोचनी लवलवणारे..तू आल्यावर..! ©संतोषकुमार विजय उईके, गोंडपिपरी जिल्हा.चंद्रपूर गझल..तू आल्यावर