शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांची कविता .शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकूण ९८ कविता आहेत. शेती ,माती ,निसर्ग यांचा माणसानेच सुरु केलेला घातपात आणि बेगडी जगण्यात स्वतःचं माणूसपण हरवलेला माणूस हा या कवितेचा नेमका धागा आहे.तर बाई जेव्हा झाडते ना अंगण तेव्हा सूर्यच तिच्या मुठीत येतो.... ही विस्तवाची दाहकता भोगणा-या स्री जन्माची कैफिअत सांगणारीही ही कविता आहे.रेल्वेगाडीत भातुकलीची भांडीकुंडी विकणारी म्हातारी मातीचं सत्व सांगत असते,गाडीतील सा-याजणी तिला हसतात.परंतु ‘देह मातीचे भतुके’ हे सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढलेल्या बायकांनां कळत नाही.नकळत त्या जिवंतपणीच आयुष्याची माती करीत असतात असा विवेकाचा स्वोज्वळ स्वरही या कवितेला आहे. कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी आणि केलीच कधी चाचपणी तर.... तिला गर्भात मारू नये असं आत्मचिंतन त्यांनीच केल्यामुळे मी ही फार चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही.परंतु एक चांगला संग्रह आनंद देवून गेला हे नक्की. या संग्रहाचे मुखपृष्ठ करण्याचं भाग्य लाभलं हे देखणं नशीबचं. या संग्रहातली 'बहर' ही एक कविता खास आपल्यासाठी माझ्या अक्षरचित्रासह ........